गर्भधारणेदरम्यान काय खावे?

Language: Marathi | Published: 10 Oct 2022 | Views: 8
गर्भधारणेदरम्यान काय खावे?
गरोदरपणी जेवणात काय काय असावे ?



भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात असलीच पाहिजे. कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी. गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून जेवणात असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमाटो, काकडी वगैरे कच्चे खाणे अधिक चांगले. रोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे. पेरू, चिकू, केली, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही स्वस्त फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात. मटण, मासे, अंडी, यापैकी काहीतरी मधूनमधून जेवणात असावे. सर्वसाधारणपणे वरील गोष्टी जेवणात असतील असे पहावे म्हणून असा आहार समतोल आहार होईल.
मटण, मासे, अंडी असा आहार गरोदरपणात घ्यायला सांगतात. मग शाकाहारी लोकांनी काय करावे ?

शाकाहारी लोकांनी जेवणात कोणत्याही डाळीचे घट्ट वरण आणि मोड आलेली मटकी, दूध, हरभरे, भुईमुगाचे दाने, मूग, वाटाणे, सोयाबीन अशी कडधान्ये खाल्यास आवश्यक ती प्रथिने मिळतात. मग मटण, मासे, अंडी घ्यावयाची गरज नाही.
जेवणाच्या वेळी आणखी काय काळजी घ्यावी ?

गरोदर स्त्रीने शक्यतो ताजे अन्न खावे. ३-४ वेळा थोडे थोडे करून जेवावे. एकावेळी पोटभर जेवू नये. ४ घास कमी खावेत. म्हणजे अन्न नीट पचते. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. दिवसभरात साधारणपणे ४-५ तांबे पाणी प्यावे. बद्धकोष्टता होणार नाही याची काळजी घ्यावी.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp