मासिक पाळी बंद होणे ज्याला आपण मेनोपॉज असेही म्हणतो, साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर मासिक पाळी बंद होण्याचा त्रास सुरु होतो पण काही महिलांमध्ये हा त्रास चाळीशीच्या आधीही दिसून येतो.
मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल
मेनोपॉझ, रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. वयाच्या तेराव्या, चौदाव्या वर्षी सुरू झालेली मासिक पाळी आता थांबायची वेळ आलेली असते. साधारणपणे वयाच्या चाळीशीनंतर हा काळ सुरू होतो. यानंतर तिची आई होण्याची क्षमता संपणार असते.
आणि याचवेळी स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत जातात. इतक्या वर्षांची झालेली सवय बदलणं काही जणींना खूप अवघड जातं. यासाठीच काही काळजी घेणं आवश्यक आहे.
काही स्त्रियांच्या बाबतीत खूपच लवकर म्हणजे चाळीशीच्या आधीच रजोनिवृत्ती येते. याचं कारण म्हणजे काहीतरी शारीरिक बदल किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड व्याधी यामागे असते.
कधीकधी अंडाशयाचा कॅन्सर आणि त्यामुळे गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते नंतर त्याचे उपचार, केमोथेरपी या सगळ्यांचा परिणाम म्हणून रजोनिवृत्ती लवकर होते.
जाणून घेऊयात रजोनिवृत्तीची कारणं आणि घ्यावयाची काळजी….
स्त्री जन्माला येते ती तिच्या बिजकोषातल्या बिजांसहित. तिच्या अंडाशयात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरोन हे हार्मोन्स तयार होत असतात आणि हेच हॉर्मोन्स बीज कधी सोडायचं आणि कधी नाही यावर कंट्रोल करतात.
यांच्यामुळेच स्त्रीची मासिक पाळी सुरू असते. साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर हे हार्मोन्स दर महिन्याला बीज सोडणं थांबवतात आणि स्त्रीचा मेनोपॉझ सुरू होतो. ही प्रक्रिया काही एकदम होत नाही, ही स्लो प्रोसेस आहे.
साधारणपणे याचे तीन टप्पे पडतात
प्री मेनोपॉझ :
हा कालावधी मेनोपॉझ सुरू होण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून चालू होतो यामध्ये बीजाशयात इस्ट्रोजन कमी तयार व्हायला सुरुवात होते. रक्तस्त्राव कमी होत राहतो आणि ही प्रक्रिया संपूर्ण रजोनिवृत्ती होईपर्यंत सुरूच राहते.
शेवटच्या एक-दोन वर्षात इस्ट्रोजन लेवलची पातळी जास्त घसरते… बऱ्याच स्त्रियांना याची लक्षण दिसतात.
मेनोपॉझ :
सलग एकवर्ष मासिक पाळी येत नाही. या काळात बिजाशयानी बीज सोडणं आणि इस्ट्रोजन तयार करणे पूर्णपणे थांबवलेलं असतं.
पोस्ट मेनोपॉझ :
ही रजोनिवृत्तीनंतरची अवस्था असते. या काळात साधारणपणे दोन वर्ष मासिक पाळी येतच नाही आणि नंतर ती पूर्णच थांबते. काही काही स्त्रियांना अचानक गरम वाटणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात.
या काळात इस्ट्रोजन बनणे पूर्णपणे थांबलेले असते.
मेनोपॉझची लक्षण :
१) मासिक पाळी नियमित राहत नाही. कधी कधी खूप जास्त आणि वेदनायुक्त रक्तस्त्राव होतो. तर कधी खूप कमी रक्तस्त्राव किंवा spotting होतं.
२) गर्मी होणं, घाम येणं आणि जीव घाबराघुबरा होणं.
३) पुरेशी झोप न होणं. निद्रानाशाचा विकार जडणं. डोकेदुखी वाढणे.
४) उदास वाटणं. घरातील लोक आपल्याला टाळत आहेत असं वाटून अजून उदास होणं.
५) सतत थकवा जाणवणं.
६) स्वभावात विक्षिप्तपणा येणे. मूड स्विंग हा प्रकार बऱ्याच जणींमध्ये फार दिसून येतो.
७) सांधे दुखी आणि स्नायूंची दु:खी यावेळेस सुरू होते.
८) योनीमार्गात कोरडेपणा जाणवणे.
९) कामेच्छा कमी होणे, शारीरिक संबंध नको वाटणे, त्यात उदासीनता येणे.
१०) काहीजणींना मूत्रमार्गात अडचणी जाणवतात किंवा त्यावरचा कंट्रोल कमी होतो.
यापैकी कुठल्याही तक्रारी जर चाळीशीनंतर एखाद्या स्त्रीला जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जाणे आणि व्यवस्थित तपासणी करून घेणे हितकारक असतं. त्यामुळे पुढे जर काही समस्या उद्भवणार असतील तर त्यांचं निराकरण करणं डॉक्टरांना सोपं जातं.
मेनोपॉझ उपचार :
मेनोपॉझ ही खरंतर नैसर्गिक गोष्ट गोष्ट आहे. ठराविक वेळेनंतर ती येते आणि जाते, ज्या काही साध्यासुध्या अशा तक्रारी असतात त्या थोड्या दिवसांनी हळूहळू कमी होतात. पण कधीकधी हा कालावधी जाण्यासाठी त्रास होतो.
किंवा काही वैद्यकीय समस्या निर्माण होतात त्यावेळेस मात्र डॉक्टरांकडे जाणे आणि योग्य ते उपचार करून घेणे गरजेचं असतं.
१) हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी
ज्यावेळी स्त्रीच्या शरीरात हार्मोन्स कमी होत जातात आणि नवीन तयार होत नाहीत, त्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते. त्यामुळे योनिमार्गाच्या काही तक्रारी कमी होणे गर्मी कमी होणे, हाडांची मजबुती वाढणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात.
परंतु या थेरपीचा एक मोठा धोका आहे तो म्हणजे याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून ही हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी कमी कालावधीसाठी करणं चांगलं असेल. किंवा त्याचा डोस कमी घेणं गरजेचं असतं.
२) बाह्य उपचार पद्धती
योनीमार्गातील ड्रायनेस कमी व्हावा म्हणून क्रीम मिळते ज्यामधून इस्ट्रोजन मिळू शकतो.
३) हार्मोन्स उपचार पद्धती
बाहेरून हार्मोन्स घेतलं तर काही त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. म्हणून हार्मोन्स न घेता पण इतर दुसरी औषधे घेऊनही गर्मी कमी करणे, थकवा कमी करणे आणि इस्ट्रोजन लेवल वाढवणे यासाठी दुसरी काही औषधे उपलब्ध आहेत. जी ह्या काळासाठी स्त्रियांना उपयोगी पडतील.
४) हाडे ठिसूळ न होण्यासाठी घ्यायची औषधे
संपूर्ण पाळीच्या कालखंडात, बाळंतपणामध्ये स्त्रियांचा बराच ब्लड लॉस किंवा रक्तस्त्राव होतो तसचं मेनोपॉझनंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते.
त्याचाच परिणाम म्हणजे स्त्रियांची हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते. त्यासाठी विटामिन डी आणि कॅल्शियमच्या गोळ्या नियमितपणे चालू केल्या पाहिजेत.
आपल्या जगण्यातल्या छोट्या-छोट्या सवयींमध्ये काही बदल केले तर मेनोपॉझ खूप आनंदाने घेता येऊ शकतो.
नियमितपणे योगा, व्यायाम करणे जेणेकरून पुरेशी झोप होईल आणि चिडचिड कमी होईल. तसंच हार्ट डिसीज, डायबिटीज आणि ऑस्टियोपोरोसिस यांना प्रतिबंध घालता येईल.
योनीमार्गातील कोरडेपणा घालवण्यासाठी काही क्रीम्स, मॉइश्चरायझर लावणे.
शक्यतो धूम्रपान करूच नये कारण तंबाखूमुळे मेनोपॉज लवकर चालू होतो आणि उन्हाचा त्रास जास्त होतो.
अल्कोहोल किंवा ड्रिंक्स घेणे पण सध्याची एक लाईफस्टाईल झालेली आहे. पण त्यावर थोडंसं निर्बंध घालणं गरजेचं आहे.
शक्यतो आपल्या मित्र-मैत्रिणीं बरोबर जास्त वेळ घालवणे किंवा एखादा आपला छंद जोपासणे हे सगळ्यात उत्तम उपाय आहेत, ज्यामुळे आनंदी राहण्यास मदत होते. एखादी छानशी सहलही आनंद देऊन जाते.
निरनिराळ्या हेल्दी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे. ज्यामुळे आनंदी राहता येतं आणि शरीराला आवश्यक असणारे घटक ही मिळून जातात.
नियमित योग, दीर्घश्वसन यांचाही खूप फायदा होतो. रिलॅक्सेशनसाठी कधीकधी मसाज पण करून घ्यावा.
वेळोवेळी शरीराच्या सर्व चाचण्या करून घेणे.
मेनोपॉजसाठी काही आयुर्वेदिक, हर्बल औषधं बाजारात उपलब्ध आहेत पण, शक्यतो एखाद्या तज्ञ वैद्य किंवा डॉक्टर यांना विचारूनच अशी औषधे घ्यावीत.
मासिक पाळी किती वर्षानंतर बंद होते?